जुन्नर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहायक व मंत्रालय सहायक या परीक्षेमध्ये अनुक्रमे महाराष्ट्रात पाचवा व तेरावा क्रमा...
जुन्नर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहायक व मंत्रालय सहायक या परीक्षेमध्ये अनुक्रमे महाराष्ट्रात पाचवा व तेरावा क्रमांक पटकाविण्याचे काम जुन्नर येथील मनमित बनकर याने केले असून तरुणांपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे त्यांचे जुन्नर तालुक्यातील विविध संस्था व पदाधिकारी यांचे वतीने अभिनंदन व सत्कार केला जात आहे.
मनमित हा जुन्नर येथील खालचामाळी वाडा येथील शेतकरी कुटुंबातील आई शेती करून घराचे स्टेरिंग सांभाळत तर वडील कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी ट्रकचा स्टेरिंग सांभाळत होते आपल्या मुलांच्या पदरी आपल्यासारखे कष्ट वाट्याला येऊ नये म्हणून मुलांनी खूप शिकलं पाहिजे असा अट्टाहास आई-वडिलांचा असायचा मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन उच्च पदावर अधिकारी व्हावं असे वडिलांचे स्वप्न होते. मनमित ने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये कर सहायक व मंत्रालय सहाय्यक या दोन जागांसाठी घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्रात पाचवा व तेरावा येण्याचं बहुमान मिळवला आणि वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केला परंतु मुलाचे यश पाहण्यासाठी वडील मात्र या जगामध्ये नाहीत त्यामुळे आपल्या यशाबद्दल बोलताना मनमितला गहिवरून आले होते.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात,जुन्नर इथे झाले. बी एस सी च शिक्षण श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर इथे झाले. एम एस सी च शिक्षण श्री रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी इथे झालं. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही वर्षे पुण्यातील एक फार्मा कंपनी मध्ये नोकरी केली. नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील माहिती मिळाली. नंतर नोकरी सोडून पूर्णवेळ अभ्यास चालू केला. पहिल्या दीड वर्षातच एल आय सी मध्ये डेव्हलपमेंट ऑफीस म्हणून नोकरी मिळाली. थोडे दिवस नोकरी करून राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा परीक्षेची तयारी सुरू केली. दरम्यान च्या काळात UPS च्या परीक्षा दिल्या पण थोड्या मार्काने तिथे अपयश येत होते. नंतर पूर्णपणे लक्ष MPSC कडे केंद्रीत केले आणि चार वेळा राज्यसेवा मुख्य परिक्षा दिली परंतु तिथे ही अपयश आले. 5 वेळा पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पास होऊन फाइनल सिलेक्शन झाले नाही. तीन वेळा वनसेवेच्या मुख्य परीक्षा दिल्या तिथेही असेच अपयश. अशा प्रकारे अपयश सातत्याने येत होते परंतु 10 वर्षे अपयश पचवून सतत अभ्यास करून शेवटी एकाच वेळी कर सहायक आणि मंत्रालय सहायक अशा दोन ठिकाणी निवड झाली.
बोलताना मनमित म्हणाला ह्या संपूर्ण प्रवासात खरी प्रेरणा म्हणजे वडिलांची स्वप्नपूर्ती ही होती. वडील ट्रक ड्रायवर असून देखील त्यांची शिक्षणाप्रती खूप आस्था होती. तसेच आई शेतीकरून आमचा उदरनिर्वाह आणि शिक्षण दोन्हीची जबाबदारी पार पाडत होती. आई वडिलांच्या कष्टाचं चीज होवो ही मनात इच्छा होती. तसेच दादा आणि वहिनी यांनी अपयशाच्या काळात खूप धीर धरून आर्थिक चणचण कधीच भासू दिली नाही. लहानपणी पासून शिक्षणासाठी मामा आणि मामींनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जबाबदारी सांभाळली. कधी कलासेस साठी कधी पुस्तकांसाठी तर कधी आजारपणासाठी लहानपणीच्या मित्रांनी देखील आर्थिक मदत केली. तसेच कोरोना काळात खूप जास्त आजारी पडलो तेव्हा बरेच महिने डिप्रेशन मध्ये होतो. मानसिक ताणतणाव यामुळे केलेला सर्व अभ्यास जवळपास विसरून गेला होता. अशा अडचणीच्या प्रसंगी माझे बनकर कुटुंब नेहमीच माझ्या सोबत होते. त्यांनी मला वेळोवेळी धीर दिला आणि कधीच खचू दिले नाही.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्यासाठी मित्र कुलदीप जाधव तसेच स्पर्धा यश अकादमीचे भूषण ओझर्डे यांचे सतत मार्गदर्शन लाभले. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि श्रीमत भगवत गीता यापासून सतत कार्यरत,उच्छाही आणि स्थितप्रज्ञ राहण्याची प्रेरणा मिळाली. ह्या पदाच्या माध्यमातून समाजाची निस्वार्थी सेवा करण्याचा प्रयत्न असेल. तसेच स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील एक टप्पा पूर्ण करून आता भविष्यातील पुढच्या पदासाठीच्या परीक्षांची तयारी सुरू ठेवणार आहे. मिळालेल्या पदाला आणि कार्याला न्याय देऊन पुढील परीक्षेसाठी नेहमी प्रमाणे आणि त्याच ताकदीने प्रयत्नशील असणार आहे.
COMMENTS