मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. येत्या 21 फेब्रुवा...
मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. येत्या 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीत या परीक्षा होणार आहेत.
दरम्यान आता दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे. बोर्डाच्या निर्णयानुसार, उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये, असे आदेश केंद्रांना दिले आहेत.
गतवर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाल्यानंतरही परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता.
मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांचा इथून पुढे विचार करण्यात येणार नाही व त्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 तर दुपारी 02.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रदेखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.
COMMENTS